NEWS PRAHAR ( पुणे ) : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री खराडी बायपास जकात नाक्याजवळ घडली. कल्याणीनगर भागात नुकत्याच झालेल्या पोर्श मोटार अपघातात दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटले असतानाच पुन्हा अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा बळी गेला आहे.
आदिल मजहर शेख (वय २०, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर) आणि फहाद गोहर गुलाम असकर शेख (वय २०, रा. खडकपुरा, ता. औसा, जि. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे पुण्यातील वाघोली येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होते. या अपघातात अफान शौकत शेख (वय २०, रा. उदगीर, जि. लातूर) जखमी झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ट्रकचालक श्यामबाबू रामफल गौतम (वय ३५, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत अफान शेखने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा संपल्याने आदिल आणि त्याच्या मित्राला गावी जायचे होते. पुणे स्टेशनला जाण्यासाठी तिघेजण दुचाकीवरून निघाले होते. ते खराडी बायपास चौकातील वाघेश्वर पार्किंगजवळ सिग्नलला थांबले होते. त्यावेळी वाघोलीहून चंदननगरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ट्रकने दुचाकीवरील तिघांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यात आदिल आणि फहाद हे दोघे गंभीर जखमी झाले. आदिलचा जागीच मृत्यू झाला. फहादला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.